दिनांक – ०७/०५/२०२५,मुंबई प्रतिनिधी,गर्जा महाराष्ट्र न्यूज:- भिवंडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता श्री संदीप पटनावर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते एकाच पदावर कार्यरत असून, यांच्या कार्यकाळात भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पाहण्यासाठी दैनंदिन दैना होत आहे नियमानुसार त्यांची बदली न झाल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक सचिव अनिल महाजन यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रधान सचिव, नगर विकास मंत्रालय, डॉ. के. गोविंद राज नवी 2 मंत्रालय यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीत संदीप पटनावर यांच्याविरुद्ध चौकशी समिती नेमण्याची आणि त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनिल महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पटनावर यांच्यावर पाणीपुरवठा विभागातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. तरीही प्रशासकीय स्तरावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. शासकीय नियमानुसार, कोणत्याही अधिकाऱ्याची एकाच पदावर इतक्या दीर्घ काळ ठेवणे अनुचित आहे, आणि यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. महाजन यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी केली असून, भिवंडीच्या नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम पाणीपुरवठा व्यवस्था मिळावी, यासाठी ही लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तक्रारीचा आढावा आणि मागण्या:
– संदीप पटनावर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमावी.
– शासकीय नियमांचे पालन करत त्यांची तात्काळ बदली करावी.
– पाणीपुरवठा विभागातील अनियमितता आणि गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी सर्वंकष तपास करावा.

अनिल महाजन यांनी याबाबत सांगितले की, “भिवंडी महानगरपालिकेतील भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेत गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करत राहू आणि आवश्यकता भासल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबू.”

प्रशासनाची भूमिका काय?

संदीप पटनावर यांच्यावरील आरोपांबाबत भिवंडी महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. तक्रार अर्ज दाखल झाल्याने आता नगर विकास मंत्रालय या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि लवकरच चौकशी समिती नेमली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांची अपेक्षा:
भिवंडी शहरातील नागरिकांनी या तक्रारीचे स्वागत केले असून, पाणीपुरवठा विभागातील पाणी चोरीचे प्रमाण जास्त होत आहे व अनियमिततांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईकडे भिवंडीकरांचे लक्ष आहे.

Share.