दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून राज्याच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनात एकूण 20 विधेयके मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित मंत्रिपरिषद बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशन आहे आणि थंडी देखील आहे. त्यामुळे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल, अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्यांवर चर्चा, सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असे कामकाज होणार असून त्यासोबत जवळपास वीस विधयेके मांडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरिता मतदान केले आहे, म्हणून आमचे सरकार हे ‘ईव्हीएम’ सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ ‘एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’ असा आहे. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घडविण्याकरिता या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे कामकाज करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसासाठी भावांतर योजना राबवून बाजारभाव व हमीभाव यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. तसेच धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20 हजार रुपये दिले. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणारे शासन आहे, असेही त्यांनी सांगितले.
परभणीमधील घटना ही एका मनोरुग्णामुळे घडली असून मनोरुग्णाच्या कृत्यावर कोणतेही असंविधानिक उद्रेक करणे योग्य नाही. हे शासन संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारे आहे. संविधानाच्या बाहेर तसूभरही वेगळे काम करणार नाही. आमचे सरकार संविधानाचा गौरव करणारे आहे. बीड जिल्ह्यातील घटनेची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून आरोपी कोणीही असले तरी त्यांना सोडले जाणार नाही. अशा घटना महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात व यापुढेही घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.