दिनांक –१०/०१/२०२६, जळगाव/चाळीसगाव प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- जळगाव/छत्रपती संभाजीनगर: उज्जैन येथील महाकालेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांच्या ग्रुपवर काळाने घाला घातला आहे. चाळीसगाव नजीक असलेल्या कन्नड घाटात (Kannad Ghat) झालेल्या भीषण कार अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना बुधवारी (७ जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मृतांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तरुणांचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव येथून सात मित्र एका कारने (MH 16 DS 6050) देवदर्शनासाठी उज्जैनकडे (Ujjain) निघाले होते. रात्रीच्या सुमारास त्यांची कार कन्नड घाटातील धोकादायक अशा ‘व्ही पॉइंट’ (V-Point) जवळ आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली कार थेट घाटातील संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि गाडीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे: अपघातात प्राण गमावलेले तिघेही तरुण शेवगावचे रहिवासी होते. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १. तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७) २. शेखर रमेश दुरपते (वय ३१) ३. घनश्याम रामहरी पिसोटे (वय ३०)
जखमींची प्रकृती: या अपघातात कारमधील इतर चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय शिवाजी गिरे (२५), योगेश तुकाराम सोनवणे (२८) आणि ज्ञानेश्वर कांता मोडे (२४) यांना उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर तुषार रमेश घुगे (२६) याच्यावर चाळीसगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतदेहांचे शवविच्छेदन चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. देवदर्शनाला जातानाच असा भयंकर शेवट झाल्याने शेवगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share.